कोणत्याही माणसाच्या आयुष्यात सुखाचे आणि दु:खाचे खेळ सुरुच असतात. माणसाच्या पडत्या काळात त्याचे मन अस्थिर बनते आणि मग आधारासाठी परमेश्वर किंवा गुरु यांच्या पायाशी त्याला जावे लागते. वाईट परिस्थितीमुळे हतबल झालेला माणूस कोणता ना कोणता आधार शोधत राहतो. कुणी गंडे, दोरे, ताईत बांधतो तर कुणी देवाला संताला साकडे घालतो. वाईट काळ आल्यामुळे अगतिक झालेला माणूस कोणत्याही थराला जातो. नवससायास करुन झाले व हाती काहीच लागले नाही तर अघोरी मार्गाकडे जाणारे काहीजण असतात. माणसाच्या मनात श्रद्धा असते व ती त्यांच्या माता-पित्याने संस्कारातून त्याच्या मनात रुजवलेली असते. पण एखाद्या प्रतिकूल परिस्थितीत माणूस हळवा बनतो आणि त्याच्या मनातील श्रद्धेचे रुपांतर अंधश्रद्धेत होण्यास वेळ लागत नाही. आजुबाजूचे मित्र व नातेवाईक संकटातून बाहेर पडण्याचे नाना उपाय सुचवू लागतात आणि कळत नकळत माणसे अंधश्रद्धेकडे ओढली जातात. कुणाच्याही श्रद्धेची टिंगल टवाळी करु नये असे जरी असले तरी श्रद्धेची वाट अंधश्रद्धेकडे कशी आणि कधी जाते हे बर्याच जणांना कळतही नाही. परंपरागत अंधश्रद्धेने वागणारा मोठा समाज आजही भारतामध्ये आहे. यात अशिक्षित अडाणी जनतेबरोबर सुशिक्षित लोकदेखील आहेत. आपल्या देशात भरणार्या लाखो यात्रा या श्रद्धेपेक्षा अंधश्रद्धेवर जास्त आधारीत आहेत. नद्यांच्या संगमाचे प्रदेश व इतर काही तीर्थक्षेत्रे पवित्र असून तेथे स्नान केले असता पापांचा नाश होऊन पुण्याची प्राप्ती होते असा समज की गैरसमज पुराणकाळापासून प्रचलित आहे. कैलास पर्वतापासून ते थेट कन्याकुमारीपर्यंत आणि द्वारकेपासून जगन्नाथपुरीपर्यंत लाखो तीर्थस्थाने आजही लोकांच्या गर्दीची ठिकाणे आहेत. देवीच्या साडेतीन शक्तीपीठांच्या बरोबरीने पंढरपूर व देहू आळंदीला सारखेच महत्व आहे. पण यापेक्षा जास्त गर्दी असते ती साईबाबांच्या शिर्डी संस्थानात होय. रोजच्या रोज पन्नास हजारांच्या वर साईभक्त शिर्डीत दर्शनासाठी येतात आणि साईंच्या चरणी रोजच्या रोज येणारे दान लाखाच्या वर आहे. वर्षाला साडेचार अब्ज रुपयांचे दान भक्त या फकीरबाबाच्या दानपेटीत टाकतात. दहा अब्जाच्याही वर साई संस्थानची गुंतवणूक आहे. एवढा प्रचंड पैसा जेथे गोळा होतो तेथे स्थानिकांच्या बरोबरीने राजकारणी मंडळीही वावरत असतात. या प्रचंड उलाढालीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नेते मंडळींमध्ये चढाओढ सुरु असते. या सर्व खेळात स्थानिक जनतेला डावलून राजकारणी नेत्यांनाच घुसविले जाते. आणि मग सुरु होतो एक मोठा घोडेबाजार. आज साई संस्थानची गोष्ट एका वेगळ्या वळणापाशी येऊन पोचलेली आहे. संस्थानच्या विश्वस्त मंडळात वर्णी लागली की बर्याच गोष्टी फुकटात मिळतात व आपल्या नावाला वजन प्राप्त होते. त्यामुळेच सरकार आपल्या बगलबच्चांची नेमणूक या मंडळावर करते. सध्या या मंडळावर एकूण सोळा जण आहेत. यात आठ माणसे कॉंग्रेसची व आठ जण राष्ट्रवादीचे आहेत. येथे समसमान हिस्सा दोन्ही कॉंग्रेसवाल्यांनी करुन घेतलेला आहे. २००३ साली या मंडळाची नेमणूक तीन वर्षांसाठी झालेली होती. म्हणजे २००७ सालात नवे मंडळ निर्माण व्हावयास हवे होते. पण दरवेळी या लोकांची मुदत वाढवून दिली गेली. आज जुन्या विश्वस्त मंडळाची मुदत संपून सहा वर्षे लोटली तरी नवे मंडळ निर्माण झालेले नाही. बहुतेक देवस्थानच्या विश्वस्त मंडळाबद्दल लोकांच्या तक्रारी असतात तशा शिर्डी संस्थानाबद्दलही आहेत. काही वर्षांपूर्वी विश्वस्त मंडळ संपूर्णपणे बरखास्त करुन कोर्टाने आपला माणूस नेमला होता. सध्याच्या मंडळातील काही जणांवर गैरप्रकार केल्याचे आरोप आहेत त्याबाबत चौकशी कोण करणार?हाच मोठा प्रश्न आहे. मध्यंतरी साईंच्या पादुका परदेशी पाठवण्यावरुन मोठा वाद जनता आणि मंडळात झालेला होताच. सध्याही स्थानिक जनतेचे व भाविकांचे आणि विश्वस्तांचे पटत नाही. त्यातूनच स्थानिकांच्या मदतीने न्यायालयात याचिका दाखल झाली आणि कोर्टाने हे मंडळ ताबडतोब बरखास्त करुन पंधरा दिवसात नवे मंडळ नेमावे असा आदेश दिला. या आदेशाचे शिर्डीतील जनतेने फटाके वाजवून स्वागत केले व आपला आनंद जाहीर केला.
साई संस्थानाकडे अब्जावधी रुपयांची संपत्ती आहे. शिर्डीला विमानतळ व्हावं म्हणून साई संस्थानाने दोनशे कोटी रुपये देऊ केले. पण त्यावरुनही वाद निर्माण झाला. आज शिर्डीत भक्तांचा ओघ रोजच्या रोज वाढत आहे. त्यांच्या निवासासह बर्याच सुविधा तेथे अपुर्या आहेत. भक्तांची मागणी विमानतळापेक्षा या सुविधांसाठी आहे. पण आम्हाला एका गोष्टीचे नवल वाटते ते म्हणजे साईबाबांचे सारे आयुष्य फकीरीत गेले. गोरगरीब जनतेत ते जास्त रमले. मात्र त्यांच्या भक्तांनी त्यांना संगमरवरी सिंहासनावर सोन्याच्या मखरात नेऊन बसविले व त्यांच्या अंगावर हिर्या माणकाची शाल टाकली. भक्तांची ही आगळी सेवा आम्हाला न कळणारी आहे.